नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोविडच्या संसर्गाचं प्रमाणही कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत, तीन लाख ५७ हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले आहेत. याबरोबरच कोविडमधून रूग्ण बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक ७६ शतांश टक्के  झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, काल एका दिवसात २ लाख ५७ हजार नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजाराहून अधिक रूग्णांचा मृत्यु झाला. सध्या देशभरात  २९ लाखांहून अधिक रुग्ण  सक्रीय आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, एकूण कोविड चाचण्यांची संख्या ३२ कोटी ६४ लाख इतकी झाली आहे. गेल्या चोविस तासात, २१ लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत १९ कोटी ३३ लाख लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.