मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी दर आता १६ टक्क्याच्या खाली आला आहे. मात्र मृत्युदरात किंचित वाढ झाली असून, कोरोनाबळींची एकूण संख्या एक लाखाच्या वर गेली आहे.

राज्यात काल १४ हजार ४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २३३  रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी ६५ लाख ८ हजार ९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  १५ पूर्णांक ९७ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले.

म्हणजेच आतापर्यंत ५८ लाख ३१ हजार ७८१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५५ लाख ४३ हजार २६७ रुग्ण बरे झाले. तर आतापर्यंत एकूण १ लाख १३० रुग्ण दगावले.

सध्या राज्यात १ लाख ८५ हजार ५२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ५ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ७२ शतांश टक्के आहे.

मुंबईत काल संध्याकाळी ७९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहेत तर ८३३ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. काल कोरोनामुळे मुंबईत २० जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा ९५ टक्के असून सध्या १६ हजार ७० सक्रिय रुग्ण आहेत. तर  रुग्ण दुपटीचा कालावधी ५२७ दिवसांवर गेला आहे.