मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ९ रुग्ण, जळगाव ७, मुंबई २, तर पालघर, सिंधुदुर्ग, आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली.

राज्याने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुने घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली. या कामासाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचेही सहकार्य घेतले आहे.

१५ मे पासून ७ हजार ५०० नमुने  घेतले, आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आलं. त्यामध्ये डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आले. त्यांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे, असे टोपे यांनी सांगितले. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे का याबाबत माहिती घेऊन, त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे.

त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झालं आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे, असे टोपे म्हणाले.