नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सुमारे ३३ लाख ८१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ कोटी ९८ लाखाच्या वर गेली आहे. काल ४५ हजार ८९२ नवे रुग्ण आढळले. तर, ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५ हजार २८ झाली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ रुग्ण उपचाराधीन आहेत.