मुंबई (वृत्तसंस्था) : महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातले समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासाकरता २५० कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातल्या, पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करायलाही त्यांनी मान्यता दिली.

त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात याविषयी आज विशेष बैठक झाली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, आणि वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातल्या पर्यटनविकासात खाजगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करायला प्रोत्साहन देण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

अर्थसंकल्पीय तरतूदीच्या २५ टक्के निधी टप्प्याटप्यानं वितरीत करण्याबरोबरच, पर्यटनविकासाच्या पूर्ण झालेल्या कामांची ७२ कोटी रुपयांची देयकन अदा करावित, जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करताना ॲग्रो टुरीझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ञांचा विचार व्हावा, असंही या बैठकीत ठरलं.