नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट’ हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देतांना सीतारामन यांनी रुपी बँकेसारख्या लहान बँकातील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे नव्वद दिवसात परत मिळतील असं आश्वासन दिलं असल्याचं खासदार गिरीश बापट यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी येत्या दोनतीन दिवसात चर्चा करून रुपी बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्नही मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू. असं आश्वासनही सीतारामन यांनी आपल्याला दिल्याचं बापट यांनी सांगितलं.