मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यापुढे कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली ,तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल, असा ईशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की  सुमारे ३० हजार रुग्णांसाठी राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल. कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचं आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे, असंही ते म्हणाले.