नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज तिसरा स्मृतिदिन. वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथल्या सदैव अटल या वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली. अटलजी हे दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि अमोघ वक्ता होते, राष्ट्र निर्माणाच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचं सदैव स्मरण केलं जाईल असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून अटलजींच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि हृदयात अटलजींचं स्थान कायम राहिल असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.