मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.

यावेळी उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पदुम मंत्री महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी विविध देशांतून आलेली पर्यटक, विविध देशांच्या दुतावासातील उच्चाधिकारी, मान्यवर आदी उपस्थित होते. चौपाटीवर श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जनसमुदायाची अलोट गर्दी झाली होती.

गणेश भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दल, एसआरपीएफ, फोर्स वन, क्युआरटी, फोर्स वन, रॅपिड ॲक्शन फोर्स, एनडीआरएफ, महापालिकेच्या विविध यंत्रणा, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक सज्ज होते. सुरक्षेच्या कारणास्तव चौपाट्या आणि विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवण्यात आले होते.