मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयानं काम करावं, समाजातल्या शेवटची महिला, युवा तसंच तृतीयपंथींपर्यंत पोचून मतदार यादीत नाव नोंदवून घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावं असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे.या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. या अभियानाअंतर्गत या महिन्यात राज्यात १३ ते १४ आणि आणि २६ ते २७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात विशेष मतदार नोंदणी शिबीरं आयोजित केली जातील, १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा आयोजित करून मतदार यादीचं वाचन केलं जाईल अशी माहिती देशपांडे यांनी या बैठकीत दिली.