महाराष्ट्रभूमी साहित्य सागर – राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्याचा सागर आहे. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात पोहोचल्यास अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

‘उत्तराखंड देवभूमि से विकासभूमि’ विशेषांक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, उद्योजक पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर तसेच मूळचे उत्तराखंड राज्यातील व आता महाराष्ट्र निवासी असलेले मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राचे लोक सांस्कृतिकदृष्ट्या अभिरुची संपन्न आहेत. राज्यातील वातावरण संगीत, नाट्य, नृत्य व कलेसाठी पोषक आहे. याकरिताच विविध राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन स्थिरावतात. महाराष्ट्रातील लोक आपल्या भाषेशिवाय हिंदी, इंग्रजी तसेच इतरही भाषा जाणतात हे उल्लेखनीय आहे.

उत्तराखंड येथून महाराष्ट्रात आलेले लोक येथील भाषा व संस्कृतीशी समरस झाल्याचे सांगून विविध राज्यांचे विशेषांक प्रकाशित करून हिंदी ‘विवेक’ राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करीत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. उत्तराखंड राज्याने स्थापनेपासून उत्तम प्रगती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते उरबा दत्त जोशी, राजेश नेगी, गिरीश शाह, अभिमन्यू कुमार, प्रशांत कारुळकर व पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.