मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जिल्हा वार्षिक योजनेच्या बाबतीत आदेश देण्यात आले असल्याचं सांगत नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरवता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच अशा आठ योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवी दिल्ली इथं काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर कमी ठेवणे , आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस, लहान मुलांचे लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान आदी विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्य सरकारने कोविडची परिस्थती आणि लसीकरण चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल मांडवीय यांनी कौतुक केलं असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.