मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातल्या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यात बोलत होते. महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीनं विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रायगडची भौगोलिक रचना लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. दिवेआगार ग्रामपंचायत आणि ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी केली. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करीत आहे, असं अजित पवार म्हणाले.