नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं या वर्षी ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेच्या १५  क्षेत्रातल्या १ हजार ८७९ रेल्वेगाड्या आंदोलकांनी अडवल्यामुळे रेल्वेचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या कोविड विशेष, सुट्टीकालीन विशेष गाड्यांसह सर्व सेवा २०२१ च्या वेळापत्रकानुसार सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. सद्यपरिस्थितीत रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित डब्यांनाच परवानगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.