नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. चालू आर्थिक वर्षात १२ हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि राष्ट्रीय महामार्गांच्या कामाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. या प्रकल्पांची कामं ठरल्या वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीनं राज्यं सरकारं आणि संबंधित यंत्रणांशी नियमित आढावा बैठकाही घेतल्या जातात, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवरच्या अपघाती जागांवर होणाऱ्या अपघातांची कारण अभ्यासून ती दूर करावित यासाठी सर्व राज्यांचे मुख्य सचिव तसंच मुख्य अभियेंते आणि प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत, असंही गडकरी यांनी सांगितलं.