मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त आकारणी केल्याच्या रुग्णांच्या तक्रारीवरून राज्य सरकारनं अशा रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्य शासनानं रुग्णांच्या तक्रारी दाखल करण्याकरिता दोन संकेतस्थळ उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी पॅनेलवर नसलेल्या रुग्णालयांकडून अतिरिक्त आकारणी केल्याच्या ६३ हजार तक्रारी दाखल झाल्या असून शासनानं बिलांची पडताळणी करून यापैकी ५३ हजार तक्रारींचा निपटारा केल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.