नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकानं राज्याचा दौरा केला. मुंबई, ठाणे, आणि पुणे परिसरात कोविड १९ तसंच ओमायक्रॉनच्या रूग्णांची वाढ असल्याचं निरीक्षण या पथकानं नोंदवलं. मुंबईची पाहणी केल्यानंतर या पथकानं राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत  काल  ठाणे जिल्ह्यातल्या रूग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या तीन गावात नव्यानं ओमायक्रॉनचे सात रूग्ण आढळले आहेत. या तिन्ही गावात दिल्या गेलेल्या लसमात्रांची संख्याही कमी आहे.