अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 ते 10 एप्रिल 2020 पर्यंत राज्यातील 1 कोटी 9 लाख 29 हजार 694 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 28 लाख, 72 हजार 280 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 15 लाख 17 हजार 891 क्विंटल गहू, 11 लाख 76 हजार 730 क्विंटल तांदूळ, तर 13 हजार 880 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 5 लाख 8 हजार 236 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ दि. 3 एप्रिलपासून टप्याटप्याने  देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 082 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.