नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा कायम भारताचा अविभाज्य भाग होता, आणि यापुढेही तो तसाच कायम राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अलिकडेच अरुणाचल प्रदेशातल्या काही ठिकाणांची नावं बदलून ती आपल्या भाषेत केली आहे. यासंबंधी माध्यमांमधून काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. या प्रश्नांच्या उत्तरात, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हे निवेदन जारी केलं आहे. अशाप्रकारचा हा चीनचा पहिलाच प्रयत्न नाही, मात्र त्यांनी केवळ नावं बदलली, म्हणून या प्रदेशाची वस्तुस्थिती बदलत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.