नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे. या निवडणुकीत १७ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५५ जागांसाठी, येत्या २६ मार्चला मतदान होईल. निवडणुकीसाठी १३ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर १६ मार्चला अर्जांची छाननी होईल आणि १८ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येतील.

२६ मार्चला मतदान झाल्यानंतर तासाभराने मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ७, तामिळनाडूतल्या ६, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी ५, ओदिशा, गुजरात आणि आंध्र प्रदेशातल्या प्रत्येकी ४, आसाम राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी ३, तसेच तेलंगणा, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंडमध्यल्या प्रत्येकी दोन जागांसह, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालयातल्या एका जागेसाठी मतदान होणार.