मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला आग लागून ६ जणांचा मृत्यू आणि इतर २३ जण जखमी झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं उपायुक्त-परिमंडळ २ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला दिले आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागचं कारण, आणि या इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये विनापरवानगी बदल केले असतील तर त्याची शहानिशा करणं, या अनुषंगानं ही समिती चौकशी करणार आहे.