मुंबई : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत दि. 01 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणूक इतर कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी संबधित समितीकडे प्रलंबित आहेत. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून ‘बार्टी’ कार्यालयाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत संबधित समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.