मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजाराच्या खाली आली आहे. काल राज्यात ३ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली, ९ हजार ८१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ४२ हजार ९४९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७६ लाख ४९ हजार ६६९ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४३ हजार ४०४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४५ हजार ९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले २१८ रुग्ण आढळले.  त्यापैकी १७२ रुग्ण मुंबईत, पुणे महानगरपालिका – ३०, पुणे ग्रामीण -४, तर गडचिरोली जिल्ह्यात १२ रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९८६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३ हजार ३३४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.