नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांना पश्चिम सीमेवर आणण्याकरता भारतीय दूतावासाची एक तुकडी पोल्टावा शहरात तैनात करण्यात आली आहे.

युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी गुगल फॉर्ममध्ये त्यांचे तपशील भरावेत असं आवाहन दूतावासानं केलं आहे. दरम्यान, युक्रेनमधील पिसोचिन इथून बाहेर पडलेल्या 44 भारतीयांचा एक गट लिवहून पोलंडच्या सीमेकडं रवाना झाला आहे तर 150 हून अधिक जण रोमानियन सीमेकडे मार्गस्थ झाले आहेत.

सुमी शहरातून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीच्या प्रयत्नात कोणतीही कसूर केली जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांनी आणखी काही तास तरी धीर धरावा, असं कीवमधील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत गेल्या आठवड्यात, दहा हजारहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. खार्किव आणि सुमी वगळता, युक्रेनच्या उर्वरित भागातील जवळजवळ सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात आलं आहे.