मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत दिली. एसटी कर्मचारी आणि ग्रामीण जनतेसाठी हा संप मिटणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात विधानपरिषदेत आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे सदनाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. सदनाचं आज नियमित कामकाज सुरू होताच शेकापचे जयंत पाटील यांनी प्रथम हा प्रश्न उपस्थित करत काल तीन एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं. सरकारनं यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा यावेळी दिला.