नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी – अधिकची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण अनुकूल बनलं असून येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

नांदेड शहरातल्या काही भागांमध्ये अर्धा तास वादळी पाऊस झाला. यावेळी जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या आंबुलगा बुद्रुक इथल्या ४२ वर्षीय महिलेचा अंगावर वीज पडल्यामुळं मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात तसंच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला.