मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. मुंबईत आज जनता दरबार कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. कोविडच्या तीन लाटांचा अनुभव राज्याला असून यासंदर्भात सरकारचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे असं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा करापोटी राज्यशासनाला अजून १५ हजार ५०२ कोटी रुपये एवठी रक्क्म केंद्राकडून मिळायची बाकी आहे, त्याचा पाठपुरावा आपण करत आहोत, असं ते म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले की भाजपचे दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक आणि सेनेचा एक अशी पाच उमेदवारांची निवड निश्चित आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. राष्ट्रवादीची मतंही शिवसेनेलाच देणार आहोत असंही पवार यांनी स्पष्ट केलं. सध्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी आमचा पक्ष न्यायालयात जात आहोत. अशी माहिती त्यांनी दिली.

जातनिहाय जनगणना झाल्यास नेमकी जातवार लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट होईल, इतर मागासवर्गियांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेले पाहिजेत हे आपलं वैयक्तिक मत आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं.