मुंबई (वृत्तसंस्था) : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यात ४६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. काेरोनामुळे बंद ठेवलेला पायी पालखी सोहळा तब्बल दोन वर्षानी पुन्हा एकदा सुरू झाल्यानं वारकरी आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रथेप्रमाणे संजीवन समाधी मंदिरात विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका सजवलेल्या पालखीतून मंदिरा बाहेर उभ्या असलेल्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. पालखीचा आज संध्याकाळचा मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर इथं आहे. त्यानंतर उद्या सकाळी पालखी सिन्नर कडे रवाना होईल.