नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या वारकरी, आणि भाविक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आणि  त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. पंढरपूर इथं तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावं, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवावा, प्रवासादरम्यान बस बंद पडली तर तातडीनं पर्यायी बसची व्यवस्था करावी असे निर्देश परब यांनी बैठकीत दिले.

यात्रेसाठी नागरिकांनी ग्रुप बुकिंग करण्याचं आवाहन त्यांनी केलं. नागरीकांनी ग्रुप बुकिंग केलं तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर आणि विठूरायाच्या दर्शनानंतर थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी, असंही परिवहनमंत्र्यांनी सांगितलं. पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसंच  प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणं आणि श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांची आणि नागरीकांची काळजी घेणे हे एसटी महामंडळाचं  काम आहे असं त्यांनी सांगितलं. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.