मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या राज्यात अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, बाठिया आयोगानुसार इतर मागासवर्ग १८ टक्के, असं एकूण ३८ टक्के आरक्षण आहे.

आरक्षणाबाबत न्यायालयात विविध निर्णयात ५० टक्के मर्यादेचा उल्लेख करण्यात येतो, त्यामुळे उर्वरित १२ टक्क्यातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, आरक्षण देता येईल, असं पाटील म्हणाले.