पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात कपबशीचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लांडे हे आमदार असताना इंद्रायणीनगर आणि परिसराचा विकास झाला. या भागातील शंभर टक्के मतदान विलास लांडे यांनाच देऊन विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना लांडे यांनी इंद्रायणीनगर, बालाजीनमधील अनेक प्रश्न सोडविले. सर्वांची कामे करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे विलास लांडे यांच्या स्वागतासाठी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर भागातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती. कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून कपबशीच्या विजयाचा जयजयकार करून जोरदार स्वागत केले. चौकाचौकात महिलांकडून विलास लांडे यांचे औक्षण करण्यात आले. लाडे यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांच्याकडून विजयासाठी शुभेच्छा घेतल्या.

इंद्रायणीनगर, लांडगेनगर, गुरूविहार पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा वसाहत, गणेशनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रोड, संतनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. डिस्ट्रिक्ट सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष सतीश थिटे, बाळासाहेब इचके, दत्तात्रय दिवटे, अशोक थोपटे, विठ्ठल माने, अशोक आहेर, संजय उदावंत, संजय भोसले, माणिक जैद, मेरी डिसुझा, अश्विनी वाबळे, संजय सातव यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे तसेच भाजप-शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील जनतेच्या डोळ्यासमोर आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकास हा केवळ कागदावरच राहिला आहे. आम्ही हे केले, ते केले म्हणून नुसते ढोल वाजविले जात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील नागरिकांची फसवणूक झाली आहे. आमदार असताना लांडे यांनी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर या भागातील नागरिकांवर कधी दादागिरी केली नाही. येथील नागरिकांना सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे काम त्यांनी केले. महापालिका निवडणुकीत या भागातून त्यांच्या मुलाचा मोठ्या फरकाने विजय झाला. विधानसभा निवडणुकीतही येथील जनता लांडे यांच्या सोबत उभी आहे. इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातून विलास लांडे यांच्या कपबशी चिन्हाला नागरिकांची पसंती आहे. येथील नागरिकांनी कपबशीलाच विजयी करण्याचे ठरविले आहे, असा विश्वास संजय वाबळे यांनी व्यक्त केला.”