नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

निरोगी भारत घडवण्याच्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा आहे. एका वर्षात 50 लाखांहून अधिक नागरिकांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला, प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांनी ‘आयुष्मान भारत’ योजनेला याचे श्रेय देऊन आभार मानले आहेत. उपचाराबरोबरच या योजनेमुळे अनेक भारतीयांच्या सबलीकरणासाठीही मदत झाली आहे.

वर्षभरापूर्वी 2018 मध्ये सुरु झालेली ‘आयुष्मान भारत’ ही जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून देशातल्या 10.74 कोटी गरीब जनतेला वैद्यकीय सुविधा सुलभपणे पोहचवण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

‘आयुष्मान भारत’ प्रधानमंत्री जन आरोग्य (पीएम-जेएवाय) 16,085 रुग्णालयं सूचीबद्ध करण्यात आली असून 10 कोटीहून अधिक ई-कार्ड देण्यात आली आहेत.

‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत देशभरात सुमारे 17,150 हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहे.