मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. अकोला शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत काल संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. शहराच्या सखल भागात पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री पावसानं पुन्हा हजेरी लावली. हातकणंगले तालुक्यातल्या घुणकी इथं काल वीज कोसळल्यामुळे दीड एकर क्षेत्रातला ऊस जळाला. आग लागल्यावर काही वेळात पाऊस सुरु झाल्यानं पंधरा ते वीस एकर परिसरातला ऊस जळण्यापासून वाचला. सातारा जिल्ह्यात कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं आज सकाळी धरणाचे २ वक्रदरवाजे १ फुट उघडले असून नदीपात्रात ४ हजार २०४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळच्या  गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं देण्यात आला आहे. जिल्ह्यात धोम, कण्हेर, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यानं काल रात्रीपासून सांडवा, सेवाद्वार आणि पायथा वीज गृहातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.