मुंबई : विधानसभेच्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत.

त्यामुळे एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गावरील सुमारे 18 हजार दैनंदिन फेऱ्या पैकी 5 हजार फेऱ्या अंशत: अथवा पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे  प्रवाशांच्या  होणाऱ्या  संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

एसटीच्या फेऱ्या कमी होणार असल्या तरी दि. 21 तारखेला मतदानासाठी सार्वजनिक  सुट्टी  तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नाही.  दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून आवश्यक त्या मार्गावर बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.  ज्या मार्गावर दिवसभरात जास्त फेऱ्या आहेत अशा मार्गावरील  फेऱ्या कमी करून, एखाद दुसरी फेरी असणाऱ्या मार्गावर सोडण्यात याव्यात.

तसेच कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेऱ्या बंद न करण्याचे निर्देशही एसटी प्रशासनाकडून दिले आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर अंशत: परिणाम होऊ शकतो, असेही महामंडळाने कळविले आहे.