नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली. उद्धव ठाकरे तसंच शिंदे गटातल्या वादानंतर, भारत निवडणूक आयोगानं ८ ऑक्टोबरला एका अंतरीम आदेशाद्वारे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटानं ही याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. भारत निवडणूक आयोगानं लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.