नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. भारताची वाटचाल विकासाच्या मार्गावर वेगानं होत असून देशातली कल्पकता, प्रतिभा आणि तंत्रज्ञानानं जगात ठसा उमटवला असल्याचं ते म्हणाले. औषध आणि लशींमधे देश स्वयंपूर्ण असल्यानं कोविडसारख्या महामारीत साऱ्या जगाला मदत करु शकला. याचा उल्लेख त्यांनी केला. ओदिशात कटक इथं भारत इंडोनेशिया दरम्यानच्या दृढ सांस्कृतिक संबंधांचं प्रतीक असलेला बाली जात्रा महोत्सव सध्या साजरा होत आहे अशी माहिती त्यांनी दिली. इंडोनेशियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी तिथल्या विकासात दिलेल्या योगदानाचा आपल्याला अभिमान वाटतो असं ते म्हणाले.