पुणे : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे असून त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर- संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित २७ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रा.डॉ. मोहन केशव फडके आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व प्रा.दत्ता दंडगे उपस्थित होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांकडून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगून मंत्री श्री.पाटील म्हणाले, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विधी असे सर्व शिक्षण मराठीत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या मार्च पासून यांची प्रश्नपत्रिका दोन भाषेत असेल. सुरूवातीलाच मराठी व इंग्रजी भाषेचे पर्याय दिले जाणार आहे. त्यातील एक भाषा निवडून त्या भाषेतच उत्तरे द्यावीत. या पद्धतीचा पहिला टप्पा पूर्णात्वास नेला जात आहे.

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत १२ वी नंतर चार वर्षांची पदवी व अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. यात ७० टक्के पाठ्यक्रम हा त्या क्षेत्राविषयी असेल. उर्वरित ३० टक्के पाठ्यक्रम योग, तत्वज्ञान, मेडिटेशन, खेळ व संगीत यासारख्या विषयांचा अंतर्भाव असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पॉइंट हे त्याच्या डिजिटल बँकेत जमा होतील. जेव्हा विद्यार्थी हा विदेशात शिक्षणासाठी जाईल तेव्हा त्याच्या डिजिटल बँक खात्यातून ते पॉइंट तेथील विद्यापीठात जमा होतील. नवीन शिक्षण पद्धत केवळ माहितीवर आधारीत नसून मानवाला परिपूर्ण करणारी असेल. जून २०३० मध्ये सर्वांना ही पद्धत अनिवार्य असेल.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातूनच मानव व जगाला दिशा दाखविता येईल. तसेच जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी अध्यात्माला समजून घेणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरांचे सर्व सिद्धांत मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. जगाला नवी दिशा देण्यासाठी नवीन शिक्षण पद्धत गरजेची आहे.

यावेळी प्रा.डॉ. मोहन केशव फडके लिखित ‘वैदिक मंत्रा फॉर द डिसिज फ्री लाइफ’ या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.