मुंबई (वृत्तसंस्था) : किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आज किल्ले प्रतापगड इथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्यदैवत असून त्यांच्या विचारांनुसार आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यांचे गडकोट, किल्ले हे आपलं वैभव आहे. त्यांचं जतन करण्यासाठी दुर्ग संवर्धन समिती कार्यरत असून त्या माध्यमातून किल्ले संवर्धन होत आहे” असंही ते म्हणाले. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रतापगड इथलं अतिक्रमण काढावं, अशी लोकभावना होती. ते अतिक्रमण काढून आम्ही लोकभावना जपली आहे आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं आहे, असंही ते म्हणाले. राज्यातल्या सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण आम्ही यापुढेही काढू, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.