नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत रेल्वेनं माल वाहतुकीद्वारे सुमारे १ लाख २० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. त्या आधीच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत यात १६ टक्के वाढ झाली आहे. रेल्वेनं ईझ ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सातत्यानं वाढ केली आहे तसंच अतिशय स्पर्धात्मक दरांमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ग्राहक केंद्री दृष्टिकोनातून व्यापार  विकास केंद्रांच्या साहाय्यानं हे शक्य झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

एप्रिल ते डिसेम्बर या कालावधीत भारतीय रेल्वेनं प्रवासी विभागात सुमारे ४८ हजार ९१३ कोटी रुपये उत्पन्न मिळवलं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ७१ टक्के वाढ झाली आहे. आरक्षित प्रवासी विभागात ४६ टक्के तर अनारक्षित प्रवासी विभागात ३८१ टक्के वाढ या कालावधीत झाली.