मुंबई (वृत्तसंस्था) : जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते, जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल मुंबईत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागानं आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत होते.

‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे. जगभरातल्या मराठी जणांना मायमराठीचा धागा बांधून ठेवतो. विश्व मराठी संमेलन, हा धागा अधिक बळकट करण्याचं सशक्त माध्यम ठरेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम राज्य शासन करीत आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई मराठीची राजधानी आहे. इथं मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही असा विश्वास मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

परदेशातील 498 मराठी मंडळांतले प्रतिनिधी, परदेशस्थ उद्योजक, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक या संमेलनासाठी उपस्थित असून, लेझिम पथकांकडून उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. मराठी संस्कृतीचं दर्शन घडविणारे देखावे संमेलनात करण्यात आले असून पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालनं उभारण्यात आली आहेत.