नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक अर्थव्यवस्थेच्या आव्हानांना लवचिकतेनं सामोरं जाण्यासाठी दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘दक्षिण आशिया पुढली सूक्ष्म अर्थव्यवस्थेबाबतची आव्हानं आणि धोरणात्मक प्राथमिकता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आशिया शाखा आणि अन्य संस्थांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.

दक्षिण आशियाई देशांचं जीवाश्म आणि आयात केलेल्या इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्यामुळे हा प्रदेश तेल, वायू आणि कोळशाच्या अस्थिर किमतीमुळे असुरक्षित असल्याचं ते म्हणाले. इंधनाच्या पुरवठा साखळीमधला हस्तक्षेप, आर्थिक, व्यापारी धोरण आणि प्रशासकीय उपाय योजनांसह विश्वासार्ह आर्थिक धोरणात्मक निर्णय, या उपाययोजना आवश्यक असल्याचं ते म्हणाले. दक्षिण आशियाई देशांनी हरित ऊर्जेकडे जलद आणि वाजवी दरात संक्रमण करण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. मोठी लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास, यामुळे दक्षिण आशियाला हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका असून, विनाशकारी हवामान बदलाच्या आव्हानांना वेळेवर आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यामध्ये मजबूत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उपयोगी ठरू शकेल, असं शक्तिकांत दास म्हणाले.