मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. चुका कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी, परंतु मुद्दाम कुभांड रचून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इतक्या खालच्या पातळीवर राज्यातलं राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर महाराष्ट्र शांत बसणार नाही, असं अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे, या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सगळ्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करुन रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती पवार यांनी बातमीदारांशी बोलताना दिली.