नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता पाच कोटीच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की या रुग्णांच्या देयकांची एकूण रक्कम ६१ हजार ५०१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आयुष्मान कार्डधारकांची संख्या २३ कोटींच्या वर गेली असून योजनेत समाविष्ट असलेली २८ हजार ३५१ रुग्णालयं आणि १२ हजार ८२४ खासगी रुग्णालयं यांच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला गंभीर आजारासाठीच्या उपचारांकरता प्रतिवर्षी ५ लाख रुपयेपर्यंतचं विमा सुरक्षा कवच मिळतं. दिल्ली, ओदिशा आणि पश्चिम बंगाल वगळता देशात सर्वत्र ही योजना लागू झाली आहे.