नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं ते बातमीदारांशी बोलत होते. फास्ट टॅगमुळे टोल नाक्यांवर वाहनांचा वेळ वाचत असून त्यामुळे झालेल्या इंधनबचतीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पैशांची बचत झाल्याचं ते यावेळी म्हणाले. जानेवारी २०२१ पासून वाहनांसाठी  फास्ट  टॅग प्रणाली वापरणं अनिवार्य करण्यात आलं होतं.

२०१३-१४ मध्ये एकूण चार हजार ७७० कोटी रुपये होत असलेली टोलवसुली २०२२-२३ पर्यंत ४१ हजार ३८२ कोटी रुपयांपर्यंत वाढली असून २०३० पर्यंत टोल महसुलाचं उत्पन्न  एक लाख तीस हजार कोटी रुपये करण्याचं सरकारचं प्रमुख उद्दिष्टय असल्याचं ते यावेळी म्हणाले. गेल्या नऊ वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत सुमारे ५९ टक्के वाढ झाली असून रस्ते बांधणीत भारताचा अमेरिकेच्या नंतर दुसरा क्रमांक लागतो, असंही गडकरी यावेळी म्हणाले.