सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी

शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी

औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्‍याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी ‍परिस्थितीत मागेल त्याला टँकर आणि मागेल त्याला छावणी देण्याला शासनाचे प्राधान्य आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

औरंगाबाद शहराजवळील करमाड येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीला श्री. पाटील यांनी भेट दिली. यावेळी श्री. पाटील येथील पशुपालकांशी बोलत होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींसह पशुपालक उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. या स्थितीत शेतकरी, पशुपालकांना आवश्यक त्या बाबी शासनस्तरावरून पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. चारा छावण्याला लागत असलेले पाण्याचे टँकर शासनाकडून पुरविण्यात येत आहे. त्यामुळे चारा छावणी मालकांचा पाण्याचा खर्चही शासनस्तरावरून होत आहे.‍ शिवाय प्रति जनावर शासनाकडून 100 रुपयांचे अनुदानही चारा छावणी मालकांना शासन देत आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 70 रुपये तर राज्य शासनाकडून 30 रुपये असे एकूण  100 रुपयांचे अनुदान देण्यात येते आहे.

शेळ्या मेंढ्यांच्या छावण्याही सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. आगामी काळात सर्वांनी वृक्ष लागवड करावी, पाण्याचा जपून वापर करावा, शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सुरूवातीला श्री. पाटील यांनी चारा छावणीची पाहणी केली. पाहणीदरम्यान दुधडचे पशुपालक एकनाथ चौधरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. चारा छावणीत दाखल बैलांना शेतावर पेरणीसाठी नेता येऊ शकते, असे पशुपालकांना सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना अल्प किमतीत बाजार समितीकडून छावणी ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आल्याची  माहिती श्री. बागडे यांनी श्री. पाटील यांना दिली.

छावणीत जवळपास दोन हजार जनावरे 

करमाडच्या चारा छावणीत आजूबाजूच्या 35 खेड्यातील दोन हजार जनावरे आहेत. शासनाच्या निर्णयानुसार मुबलक चारा, पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. चाऱ्यासाठी आवश्यक कुटी यंत्र, मनुष्यबळाची व्यवस्थाही आहे, असे श्री.पठाडे यांनी सांगितले.