ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनचा वर्धापन दिन

मुंबई : उद्योग क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे, पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जगात या क्षेत्रात आपल्या देशाला अग्रस्थान मिळविण्यासाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयमा असोसिएशनचे. डॉ. अविनाश दलाल, जयेश बारोट, प्रा. शिवा प्रसाद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचिन काळापासून आपल्या देशात उद्यमशिलतेला महत्त्व देण्यात आले आहे. युक्ती, बुद्धी आणि परिश्रम यांची सांगड घालूनच कोणत्याही उद्योगात यश संपादन करता येते . देशाच्या एकूण सकल उत्पादनात तीस टक्के वाटा हा एमएसएमई उद्योगांचा आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाअभावी बरेच एमएसएमई उद्योग हे बॅंकेचे कर्ज परतफेड न करता आल्याने नॉन परफॉर्मिंग ॲसेट होतात. अशा बंद पडलेल्या छोट्या उद्योगांमुळे राष्ट्राचीही हानी होते. यावर या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी विचार विनिमय करून तोडगा सुचवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींचा लाभ घेत असतानाच वीज, पाणी यासारख्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे हे प्रत्येक उद्योजकाचे कर्तव्य असल्याचे श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना एकाच छत्राखाली आणून सर्वांच्या औद्योगिक उन्नतीसाठी ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशन ही संस्था कार्य करते. यंदा या संस्थेला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी उद्योग क्षेत्रातील काही मान्यवरांना संस्थेचे मानद सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले.