मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि 10 सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

दुपारी एक वाजेच्या सुमारास शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. सर्वप्रथम अजित पवार यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यानंतर सर्वश्री अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ.राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादाजी भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, श्रीमती यशोमती ठाकूर, सर्वश्री ॲड.अनिल परब, उदय सामंत, ॲड.के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

सर्वश्री अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, डॉ.विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, श्रीमती आदिती तटकरे, सर्वश्री संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्यासह 8 मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर 24 मंत्र्यांनी ईश्वरसाक्ष घेऊन शपथ घेतली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिरंगासाक्ष शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. या सोहळ्याला खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.