मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी करणार्‍यांना सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे, अशी टीका  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपतर्फे धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा आणि कुसुंबा या गावांमध्ये झालेल्या प्रचार सभांमध्ये फडणवीस बोलत होते. धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ७ जानेवारीला होत आहे.

नरडाणा येथील प्रचार सभेतच धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.