पिंपरी : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून जो दणका दिला तो सर्वांत महत्वाचा होता. पवार घराण्याला घरी बसविण्याचा इतिहास पिंपरी-चिंचवडकारांनी केला. ही काळाची गरज होती, असे भाष्य पुणे शहराचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे सोमवारी दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे त्यांचे हस्ते ई-उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी बापट बोलत होते.

बापट म्हणाले, पालकमंत्री म्हणून काम करत असताना सर्वांना सोबत घेतले. सर्वांना सोबत घेऊन, मिळून मिसळून काम केले. सर्वांनी चांगली साथ दिली. त्यामुळे लोकांना वाटायचे असे पालकमंत्री कसे, एवढे साधे राहतात. आधीच्या काळात पालकमंत्री म्हटले की लोकांच्या अंगावर काटा यायचा. कारण, ते पालकमंत्रीच तसे होते, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीका केली. आम्ही निवडून येतो. त्यामुळे मालकमंत्री म्हणून नव्हे तर, लोकप्रतिनीधी म्हणून सर्वसामान्यांसोबत घेऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.