नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात यंदाच्या वन्यप्राणी गणनेला आज सुरुवात झाली. 60 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या या व्याघ्र प्रकल्पात येत्या 27 तारखेपर्यंत गणनेचे काम चालणार आहे. पहिल्या टप्प्यात वाघ, कोल्हे आदी मांसाहारी प्राण्यांची गणना केली जाणार आहे.

दुस-या टप्प्यात हत्ती, हरणं आदी शाकाहारी प्राण्यांची गणना होईल, अशी माहिती वनसंरक्षकांनी दिली. प्राणी गणनेची कार्यवाही वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाची असल्यामुळे गणनेच्या काळात पर्यटकांनी प्रकल्पात येण्याचे बेत केले असतील; तर ते पुढे ढकलावेत, अशी खास विनंती वनसंरक्षकांनी पर्यटकांना केली आहे.

वनविभागाचे कर्मचारी, वन्यजीव तज्ञ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असे मिळून तिनशेहून अधिकजण या प्राणी गणनेत सहभागी होणार आहेत.